निर्माते ताराचंद बडजात्या यांचा १० मे हा जन्मदिन. तसेच, अभिनेते मॅकमोहन यांचा १० मे हा स्मृतिदिन. त्या निमित्ताने, त्यांचा हा अल्प परिचय.........
ताराचंद बडजात्या
१० मे १९१४ रोजी ताराचंद बडजात्या यांचा जन्म झाला. त्यांना पारिवारिक व पारंपारिक चित्रपटाचे निर्माते म्हणून ओळखले जायचे. त्यांनी बॉलीवूडवर चाळीस वर्षे राज्य केले. त्यांना सेठजी या नावाने ओळखले जायचे.
ताराचंद बडजात्या यांचा जन्म राजस्थानमधील एका मध्यमवर्गीय परिवारात झाला. त्यांनी आपले शिक्षण कोलकाताच्या विद्यासागर कॉलेजमधून पूर्ण केले. त्यांच्या वडिलांना ताराचंद बॅरिस्टर व्हावेत असे वाटत होते. परंतु घरची आर्थिक स्थिती खराब असल्याने ते शक्य झाले नाही. १९३३मध्ये ताराचंद नोकरीसाठी मुंबईत आले. मुंबईत ते मोती महल थिएटर्स या फिल्म वितरण संस्थेत कामाला लागले. १९३९मध्ये त्यांच्या कामावर खुश होउन त्या वितरण संस्थेने त्यांना महाप्रबंधकाचे पद दिले व मद्रासला बदली केली.
मद्रासला त्यांच्या अनेक निर्मात्यांबरोबर ओळखी झाल्या. फिल्म वितरण संस्थेचा व्यवसाय वाढवण्यास मदत झाली. एक दिवस फिल्म वितरण संस्थेच्या मालकाने स्वत:ची वितरण संस्था सुरू करण्याचा सल्ला व आर्थिक सहायता करण्याचे आश्वासन दिले. या सर्वांमुळे ताराचंद यांनी स्वत:ची वितरण संस्था सुरू करण्याचा निश्चय केला व १५ ऑगस्ट १९४७ साली ज्या दिवशी भारत स्वतंत्र झाला, त्या दिवशी राजश्री ही वितरण संस्था सुरू केली. वितरण व्यवसायाचा पहिला चित्रपट होता चंद्रलेखा. जेमिनी स्टुडिओचा हा चित्रपट सुपरहिट झाला व ताराचंद यांना चांगला फायदा झाला व ते जेमिनी स्टुडिओचे वितरक झाले.
यानंतर ताराचंद यांनी दक्षिण भारतातील इतर निर्मात्यांना हिंदी चित्रपट बनवण्यास प्रेरित केले. अंजली, व्हीनस, पक्षी राज व प्रसाद प्रोडक्शन अशा फिल्म निर्माण संस्थांनी त्यांच्या सहयोगाने हिंदी फिल्म निर्माण करणे चालू केले. यानंतर ताराचंद यांनी फिल्म प्रर्दशनाच्या क्षेत्रात पाऊल टाकले. तेथेही त्यांना यश आले. ताराचंद यांनी फिल्म प्रदर्शनाबरोबर अनेक शहरांत सिनेमागृहे बांधली व पारिवारिक चित्रपट बनवण्यास सुरवात केली.
१९६२मध्ये आरती चित्रपटाद्वारे त्यांनी चित्रपट निर्मितीच्या क्षेत्रात पाऊल टाकले. ताराचंद बडजात्या यांनी आपल्या चित्रपट निर्मितीत कायम नवीन कलाकारांना घेऊन काम केले. १९६४ साली अभिनेता संजय खान यांना ब्रेक देऊन दोस्ती चित्रपटाची निर्मिती केली. सचिन-सारिका यांना गीत गाता चल, अमोल पालेकर-झरीना वहाब यांना चितचोर, रंजीता यांना अंखियों के झरोके से, राखी यांना जीवन मृत्यू, अरुण गोविल यांना सावन को आने दो, रामेश्वरी यांना दुल्हन वही जो पिया मन भाए, सलमान खान-भाग्यश्री यांना मैने प्यार किया अशा कित्येक जणांना त्यांनी ब्रेक देऊन बॉलिवूडमध्ये प्रवेश दिला. ताराचंद बडजात्या यांना दोन वेळा फिल्मफेअरचा सर्वश्रेष्ठ फिल्मकार हा पुरस्कार मिळाला.
ताराचंद बडजात्या यांचे २१ सप्टेंबर १९९२ रोजी निधन झाले.
.....
मॅकमोहन२४ एप्रिल १९३८ रोजी मॅकमोहन यांचा जन्म झाला. मॅकमोहन यांचे खरे नाव मोहन माखीजानी होते. आपल्या करिअरची सुरुवात त्यांनी १९६४मध्ये ‘हकीकत’ या चित्रपटापासून केली. ‘शोले’ सिनेमात सांभाची भूमिका साकारून लोकप्रियता मिळवणाऱ्या मॅकमोहन यांनी जवळपास २१८ सिनेमांत काम केले होते. अमजद खान यांनी विचारलेला ‘अरे ओ सांभा, कितना इनाम रखा है सरकार हम पर?’ हा प्रश्न व मॅकमोहन यांनी दिलेले उत्तर ‘पूरे पचास हजार’... हा डायलॉग अजूनही फेमस आहे.
त्यांनी ७० आणि ८०च्या दशकात ‘डॉन’, ‘कर्ज’, ‘जंजीर’, ‘रफू चक्कर’, ‘शान’ आणि ‘खून पसीना’सारख्या सिनेमांत खलनायक म्हणून काम केले होते. मॅकमोहन यांचे १० मे २०१० रोजी निधन झाले.
माहिती संकलन : संजीव वेलणकर